- शिक्षण महर्षीं प्राचार्य अजय कौल यांचा 3 हजार विद्यार्थ्यांना दिलासा
- कोरोना काळात तीन महिन्यांची फी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय
- विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून शिक्षण महर्षींचा सत्कार
- अन्य शाळांना कित्ता गिरवण्याचे केले आवाहन
मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – कोरोनाच्या संकटाने दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. सर्व सामान्य नागरिकांना तर फार आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा सोडवायचा हा प्रश्न भेडसावत आहे. काही शाळा व्यवस्थापनांकडून आडमुठे धोरण स्वीकारल्याने पालक वर्ग चिंतातुर झाला आहे. पालक वर्गाचा आवाज दाबण्यात आला. मात्र वर्सोव्याच्या सीडब्ल्यूसी शाळेने विशेषतः शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे या शाळेचे संस्थापक व प्राचार्य अजय कौल यांनी कोरोना काळात 3000 विद्यार्थ्यांची तीन महिन्यांची फी माफ करून येथील विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा दिला आहे.

प्राचार्य अजय कौल यांच्या या अभूतपूर्व निर्णयाने पालकांमध्ये संतोषाचे वातावरण पसरले असून कौल सरांचे आभार मानले आहेत. शिक्षण महर्षी अजय कौल यांच्या या कौतकासपद कामगिरी प्रित्यर्थ विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख , मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, अभिनेते हिंदुस्थानी भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते. वर्सोवा,यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल (सीडब्ल्यूसी) आणि क्लाराज कॉलेज ऑफ कॉमेर्स मध्ये सुमारे 3 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे.
प्राचार्य कौल यांनी सामाजिक बांधिलकी जपत भूकंप,महापूर,वादळ, अतिवृष्टी आणि अन्य घटनांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन नेहमी सढळ हस्ते मदत केली आहे. गेल्या एप्रिल,मे,जून मध्ये कोरोनाचा हॉट स्पॉट असलेल्या वर्सोवा सारख्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राचार्य अजय कौल यांची कोरोना योद्धा म्हणून कामगिरी खरोखरीच वाखाणण्याजोगीच आहे. गेली आठ महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राचार्य अजय कौल ऍक्टिव्हीटी चेअरमन प्रशांत काशीद यांनी अविरत मेहनत करून विविध उपाययोजना राबवत येथील कोरोना त्यांनी नियंत्रणात आणला. शिक्षण महर्षी अजय कौल यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले आहे अजय कौल यांचा कित्ता इतर शाळांनी गिरवावा आणि भरमसाठ शुल्क न आकारता ….मनमानी न करता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निर्णय घ्यावा असे आवाहन अभिजीत राणे यांनी सत्कारसमयी केले.







