सांस्कृतिक क्षेत्राचा ‘अनलॉक’चा मुहूर्त एका दिवसाने पुढे

Prashant-Damle

पिंपरीतील प्रयोगानंतर प्रशांत दामले यांना कोरोना

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईमधील नाट्यरसिकांना शनिवारपासून पुन्हा एकदा नाट्यअनुभव घेता येणार होता. मात्र व्यावसायिक नाटकांचा मुंबईतील मुहूर्त आणखी एका दिवसाने लांबला असून आता शनिवारऐवजी रविवारपासून व्यावसायिक नाटकांना सुरुवात होणार आहे.

 

शनिवारी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांच्या नाटकाने व्यावसायिक नाटकांच्या मुंबई अनलॉक व्हायला सुरुवात होणार होती. मात्र दामले करोना पॉझिटिव्ह असल्याने मुंबईतील हा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. मात्र सगळ्याच कलाकारांना पुण्यातील प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता मुंबईमध्येही रसिकांना तेवढीच उत्सुकता आहे, याची खात्री आहे. मुंबईमध्ये भाड्यामधील सवलतीचा निर्णय दीर्घकाळ लांबला. या काळात सोशल मीडियावरून पुणे आणि इतर शहरांमध्ये रंगलेल्या प्रयोगांबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतील प्रेक्षक व्यावसायिक नाटकांच्या वर्तमानपत्रातील जाहिरातींकडे लक्ष ठेवून होता. गेल्या आठवड्यात या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या दोन नाटकांच्या जाहिराती रसिकांनी पाहिल्या आणि ऑनलाइन तसेच नाट्यगृहामध्ये जाऊन प्रत्यक्ष तिकिट खरेदी केली. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता असे सांगण्यात आले.

 

 

पिंपरी-चिंचवड येथील प्रयोगानंतर दामले यांना ताप आल्यासारखे वाटल्याने बुधवारी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी तपासणी केली. यामध्ये त्यांना करोना झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सात दिवस विलगीकरणात राहायला सांगितल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली. त्याचवेळी काळजी म्हणून हा शनिवारी प्रबोधनचा आणि रविवारी गडकरीचा प्रयोगही रद्द करत असल्याचे त्यांनी सांगितले. दामले यांचे सहकलाकार आणि पडद्यामागचे कलाकार यांना कोणताही त्रास झाला नसल्याचेही स्पष्ट केले. लोकप्रिय अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांनी प्रेक्षकभेटीची उत्सुकता तर आहेच मात्र आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे असे सांगितले. काही दिवस विश्रांती घेऊन प्रशांत दामले बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने प्रयोग सुरू होतील याबद्दल त्यांनी खात्री व्यक्त केली. नाटक सादरीकरण करताना, तालमीच्या वेळी योग्य ती काळजी घेतली जात आहे असेही त्यांनी सांगितले.

 

मास्क, सॅनिटायझेशन, नाट्यगृहामध्ये सॅनिटायझेशन हे सातत्याने होत आहे. मात्र गेल्या काही काळात करोनाची बाधा कशी होईल याचा काहीच अंदाज येत नसल्याचे आपल्याला सगळ्यांनाच कळले आहे. जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे जे योग्य आहे त्याच पद्धतीने नियमांचे पालन करून या संसर्गातून बरे झाल्यानंतर पुन्हा प्रयोग करण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. आता शनिवारचा मुहूर्त एका दिवसाने पुढे सरकून आता अभिनेता सागर कारंडे यांच्या नाटकाने मुंबईतील व्यावसायिक नाटक अनलॉक होण्याची सुरुवात होईल. या नाटकालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रबोधनकार नाट्यगृहाकडून सांगण्यात आले. मुंबईतील नाटकांच्या पुनश्च हरिओमसाठी नाट्यगृहानेही प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी घेत पूर्वतयारी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here