स्व. शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न

chalisgaon-dibet-compitition

चाळीसगाव (प्रतिनिधी) – आज चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने “स्व. शिक्षणमहर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा” पार पडली. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. चाळीसगावचे सचिव वृक्षमित्र अरूण निकम होते. याप्रसंगी विचार मंचावर, दिलीपराव देशमुख, डॉ. सुनील राजपूत, डॉ. विनोद कोतकर, भुषण भोसले, आर्की. धनंजय यशवंतराव चव्हाण, किशोर देशमुख, सुधीर पाटील, प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव,. उपप्राचार्या डॉ. साधना निकम, प्राचार्या डॉ. साधना बारवकर, सारिका चव्हाण, इ‌. मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुनील राजपूत यांनी विद्यार्थी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. आपल्या बोलण्यातून श्रोत्यांची मने जिंकता आली पाहिजेत. प्रभावी वक्तृत्व कला शिकण्यासाठी वाचन केलं पाहिजे.

दिलीप गोविंदराव देशमुख यांनी वाचन व चिंतन कसे करावे यावर विद्यार्थी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. त्यांनी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी याप्रसंगी स्वत:च्या विविध शास्त्रज्ञ व विचारवंत यांच्यासोबत काम करत असताना आलेल्या अनुभवांना उजाळा दिला.

डॉ. विनोद कोतकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी नुसतं बक्षीस मिळविण्यासाठी स्पर्धेत सहभागी न होता आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चौफेर विकास करण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन व लेखनाचे महत्त्व विशद करून सांगितले. मा. बापुसाहेब वृक्षमित्र अरूण निकम यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांनी संस्कृती संवर्धन आणि निसर्ग संवर्धन करणे शिकले पाहिजे. तसेच, त्यांनी याप्रसंगी वक्तृत्व व वाचन यांचे जीवनातील महत्त्व विशद केले. सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच, सर्व मान्यवरांनी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रम व कार्यक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. याप्रसंगी मुकेश पवार, सौ. समृध्दी सोळंकी, प्रा. सतिश अहिरे यांनी परिक्षक म्हणून कामकाज पार पडले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम पारितोषिक: रु. १५०००/-, प्रमाणपत्र व ट्रॉफी विजेता: जगताप जालींदर भगवान, औरंगाबाद, द्वितीय पारितोषिक: रु. १०,०००/-, प्रमाणपत्र व ट्रॉफी विजेती: टावरे अश्विनी जयराम, पुणे, तृतीय पारितोषिक: रु. ७०००/-, प्रमाणपत्र व मानचिन्ह विजेता: जगताप प्रसाद देविदास, धुळे, उत्तेजनार्थ पारितोषिक: रु. १५००/-, प्रमाणपत्र व मानचिन्ह विजेता: टकले धोंडीबा रामभाऊ, अहमदनगर, शिरे धर्मेश साहेबराव, धुळे, सोनार सारांश, धुळे, पाटील प्रियदर्शनी, सांगली, चौधरी रूपाली, चाळीसगाव, पाटील समिक्षा, चाळीसगाव, देशमुख अनुजा जयदीप, चाळीसगाव, सोनार निर्भय, अमळनेर.

याप्रसंगी “कर्मवीर शिक्षणमहर्षी स्व. नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व” या विषयावर प्रथम येणाऱ्या स्पर्धकास विशेष बक्षिस रू. ५०००/- देण्यात आले. सदर स्पर्धा चालू असताना आमदार राजू मामा भोळे व उच्च शिक्षण विभाग, जळगांवचे सहसंचालक डॉ सतिश देशपांडे यांनी सदिच्छा भेट दिली. सुत्रसंचलन प्रा. एस. पी. निकम व प्रा. तुषार चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ एस. आर. जाधव, प्राचार्य शेखर देशमुख, उपप्राचार्या डॉ. साधना निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण महाविद्यालयातील व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच, याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध शाखांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here