सरकारी रुग्णालयात दहा बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? आरोग्य मंत्री राजेश टोपे राजीनामा द्या- उमेश चव्हाण

umesh-chavan

पुणे-सोगावकर –  भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे गरीब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठा आधारवड आहे.अद्ययावत म्हणून हे सरकारी रुग्णालय प्रसिद्ध आहे, मात्र आज सकाळी अत्यवस्थ बालकांवर सुरु असणाऱ्या उपचारा दरम्यान आग लागल्याने नाजूक बालकांचा होरपळून मृत्यु झाला. आरोग्यमंत्री म्हणून शासकीय रुग्णालय आणि यंत्रणांचे पितळ करोनाच्या काळात उघडे पडलेच होते. या दुर्दैवी घटनेने सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला असल्याची भावना लोकांच्या मनात घट्ट झाली आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी आग्रही मागणी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.

गरीब आणि दुर्गम भागातील लोकांचे मरण स्वस्त आहे, गर्भश्रीमंत राजकारणी- उद्योगपतींच्या बाबतीत दुर्दैवाने तरी अशी घटना घडेल का? सामान्य आणि गरिबांना खाजगी हॉस्पीटल मधील पंचतारांकित उपचार परवडणारे नाहीत. म्हणून दरवेळी मृत्युची परीक्षा द्यायची का? इमारतीचे आणि आगीचे कागदोपत्री ऑडिट आणि मेंटनन्स नावाखाली सुरु असणारा भ्रष्टाचारामुळे नवजात पाखरे दगावली.

सरकारच्या पाच लाख रुपयांच्या मदतीने गेलेले जीव परत येणार आहेत का? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here