सिरममधून कोविशिल्ड भारताच्या १३ शहरांमध्ये रवाना

kovishiled

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना रोगावर भारतातील पहिल्या ‘कोवीशिल्ड’ लसीचे डोस आज पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विमानतळाकडे रवाना झाले. त्यामुळे देशातील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याची प्रतिक्षा जवळपास संपली आहे.

सीरमच्या लशीचे तीन कोल्डस्टोरेज कंटेनर प्रथम पाठवण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी 6 कंटेनर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यातले पहिले तीन कंटेनर आज पहाटे रवाना झाले आहेत. यावेळी कंटेनरमध्ये लसीचे डोस भरल्यानंतर त्याची आतमध्ये नारळ फोडून पूजा करण्यात आली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर पोलिसांचादेखील मोठा बंदोबस्त तैनात होता. परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील या पहाटेपासून स्वतः येथे हजर होत्या. कंटेनर ठीक चार वाजून 55 मिनिटांनी गेट क्रमांक दोनमधून बाहेर पडला. यावेळी तीन कंटेनर पाठवण्यात आले. तर आता दिवसभरात एकूण 6 कंटेनर हे डोस घेऊन जाणार आहेत.

आज पहाटेच्या सुमारास तीन कंटेनरमधून विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले. कोविशील्ड लशीचे हे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये लसीचे हे डोस पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

दरम्यान, १६ जानेवारीला देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोमवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला, तसेच राज्य सरकारांना विविध निर्देशही दिले. येत्या काही महिन्यांमध्ये देशातील ३० कोटी नागरिकांना लस देण्याचे ध्येय असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here