जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे चाकू हल्ला झाल्याची घटना घडल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे. गुरुवारी मध्यरात्री (दि.१४) निवडणुकीतून दोन गटांमध्ये वाद होऊन देवपिंप्री येथे चाकू हल्ला करुन पिस्तुल रोखून धमकावण्यात आले. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी सुरू असतांना पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यात एका गटाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरुवारी मध्यरात्री वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत.
एका गटातर्फे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकार्यांविरुध्द जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात म्हटले आहे की, यमुनाबाई सपकाळे या देवपिंप्री ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा भाऊ नितीन प्रकाश सोनवणे हा देवपिंप्री फाट्यावर एकटा बसून लोकांशी मोबाईलवरून संपर्क करत होता. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी सुरेश शिंदे, चंद्रशेखर शिंदे, पप्पू शिंदे, त्यांचे दोन शालक, अमृत शिंदे, नितीन पाटील यांच्यासह काही समर्थकांना घेऊन फाट्यावर आले. त्या ठिकाणी निकम यांनी शाब्दिक वाद घातला तेव्हा समर्थकांनी चाकूहल्ला केला. तर एकाने पिस्तूल काढून धाक दाखवला. यात नितीन प्रकाश सोनवणे हा जखमी झाला आहे. त्याने याबाबत पोलीसात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.







