कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – पन्हाळा तालुक्यातील पोखले येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून दोन गटांत हाणामारी झाली. यात दगड, काठ्या, लोखंडी गज यांचा वापर करण्यात आला. हाणामारीत पाचजण जखमी झाले आहेत. परस्परविरोधी फिर्यादी दिल्याने दोन्ही गटांच्या 33 जणांना कोडोली पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे पोखलेत तणावाचे वातावरण आहे.
पोखले ग्रामपंचायत निवडणूक दोन आघाड्यांकडून अत्यंत चुरशीने लढविण्यात आली होती. सोमवारी निकाल जाहीर झाला. निकालानंतर दोन्ही गट समोरासमोर आले आणि वादाची ठिणगी पडली. दोन्ही गटांत दगड, लोखंडी गज व काठ्यांनी तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे पाचजण जखमी झाले. त्यांच्यावर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
यावेळी संदीप आमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल अविनाश पाटील, स्वप्निल तानाजी पाटील, ओंकार तानाजी पाटील, संदीप विलास पाटील, निखिल भारत पाटील, कौशल प्रताप पाटील, शुभम आनंदा नाईक, ओंकार कांबळे, अजय दयानंद कांबळे, प्रमोद प्रकाश पाटील, ओंकार भानुदास कांबळे, विकास बाळू कांबळे, भारत सदाशिव पाटील, सूरज नांगरे, पोपट प्रकाश पाटील, रवी माने व सनी शिवाजी पाटील, तर विरोधी गटाचे स्वप्निल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक जाधव, स्वप्निल आमले, अशोक जगन्नाथ धोगडे, जयसिंग संभाजी पाटील, आशिष अशोक पाटील, संदीप जयवंत आमले, प्रकाश तानाजी भोसले, अनुराग अशोक पाटील, अतुल दगडू साळसकर, अभिजित शिवाजी मोहिते, सचिन सदाशिव पाटील, आनंदा बाळासोा समुद्रे, निपुण पांडुरंग निकम, अजहर मुस्तफा मुजावर, प्रशांत सुनील कांबळे, सागर गौतम कांबळे अशा एकूण 33 जणांना कोडोली पोलिसांनी अटक केली. कोडोली पोलिस अधिक तपास करत आहेत.







