ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – लॉकडाऊनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांकडे आर्थिक चणचण आहे. मात्र तरीही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अधिकारी भरमसाठ बिले कमी करून देण्यास तयार नाहीत. वापर न करता महिन्याकाठी बंद घराचे विद्युत बिल हे सरासरी बिल पाठवून अतिरिक्त वसुलीच्या विरोधात राजकीय पक्ष आंदोलने, निषेध करीत आहेत. ठाण्याच्या लोकमान्य परिसरातील विद्युत कार्यालयाचा असाच एक सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
राहत्या घराला थ्रीफेजचे बिल पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत योग्य कार्यवाही करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी आमची चूक नसल्याचे सांगत हटवार केल्याचा आरोप ग्राहक रामपती राजभर यांनी केला आहे.
तक्रारदार रामपती राजवंश राजभर रा. भारद्वाज चाळ, डवले नगर, लाकडी पुलाजवळ, लोकमान्य नगर पद नं ३ ठाणे हे कुटुंबासह याच ठिकाणी राहतात. त्याचा विद्युत ग्राहक नं ००००१०९३४३७१ असा आहे. हे निवासी घर आहे. मात्र त्यांना अनेक महिन्यांपासून त्यांच्याकडून व्यावसायिक थ्री फेज दराने वीजबिल वसुलण्यात येत आहे. याबाबत लोकमान्य नगर उपविभाग नियंत्रण कक्ष विद्युत विभाग ठाणे यांना लेखी तक्रार केली. मात्र यापुर्वी थ्रीफेस विद्युत बिले पाठविली. ती चूक सुधारावी अशी विनंती केल्यानंतरही महावितरणचे सहाय्यक अभियंता विजय मंत्री आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता नारायण सोनावणे यांनी दखल न घेता बिल भरावेच लागेल असल्याचे सांगितले. या प्रकरणावरून निवासी घरगुती विद्युत बिलाऐवजी व्यवसायिक बिले वसूल करण्याचा गलथान प्रकार उघडकीस आला आहे.







