नाशिक (विशेष प्रतिनिधी) – बोरी, बाभळी वर मधमाश्या मोठ्या प्रमाणात पोळी बांधतात. हे अतिशय महत्वाचे आहे. शेतीच्या दृष्टीने शेतीच्या बांधावर बोरी बाभळी असणे नितांत गरजेचे आहे. हि बाब जर वेळीच आपल्या सर्वांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. अनेकजण बांधावरील बोरी बाभळी तोडून टाकतात आणि परदेशी झाड लावतात, मात्र असे करणे म्हणजे फक्त मूर्खपणाचा कळस, एवढेच मी म्हणेल. कारण गवताळ भागातील जीवसृष्टीच्या सुरुवातीपासून बोर बाभूळ हि झाड अत्यंत महत्वाची आहेत, हे विसरून चालणार नाही. डाळींब, संत्रा, मोसंबी पिक करणार्यांनी तर शेतीच्या परिसरात स्वतःच्या प्रति १ एकरात बांधावर अगदी १० बोरी व १० बाभळी झाडे लावली तरच संत्रा मोसंबी, डाळींब करावे नाहीतर काहीच उपयोग होणार नाही. आपल्याकडील छोटी मधमाश्यांची पोळी हि नेहमी अश्या काटेरी झाडांवर पोळी करतात. म्हणून नैसर्गिक झाडे ठेवणे आवश्यक आहे.
पक्षी जगासाठी तर हि बोर व बाभूळ झाड म्हणजे बहुगुणीच. अनेक पक्षी घरटी बांधण्यासाठी बोरी बाभळीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. अहो सुगरण पक्षी तर आपला खोपा अश्या झाडांवर बांधायला नेहमीच अग्रेसर असते. तिला बोरी बाभळीची झाडे खूप आवडतात, मात्र माणसाला नाही, बर का. सुगरण सर्वाना आवडते मग बाभळ का नको. आपल्या शेतीच्या कडेने पक्षी थांबे करणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा कीडनियंत्रणासाठी फक्त विषारी रासायनिक औषध वापरली जातील आणि माणूस ही विषारी होऊन मृत्यू कडे वाटचाल करेल. आपल पर्यावरण प्रेम म्हणजे फक्त नाटक असेल तर आजचा कोरोना आजार तरी कुठ वाईट आहे मग? कारण जगात अधिवास नष्ट झाले कि तिथले जीव नष्ट होतात, आणि जिथ जैवविविधता जास्त असते तिथ रोगराई कमी असते. हे आता आपल्याला शिकायला हवे आहे. आज भूतान सारख्या देश्यात फक्त ५ लोकांना कोरोना झालेला असून, हा आजार तिथ जास्त पसरलेला नाही, कारण निसर्ग अर्थात जैवविविधता सर्व जगात जास्त आहे तिथ.
अहो कोतवाल, खाटिक, पावश्या, सातभाई, सूर्यपक्षी, मुनिया, चिमण्या असे नानविध पक्षी या बोरी बाभळी वर घरटी बांधतात. हि घरटी लांबून पाहताना खूप आंनद वाटतो. आता पावशाचे काटेरी घरटे सुद्धा बाभळीच्या झाडावरच असते.
बाभळीच्या झाडावर खारुताई घरटे करीत असते. शिवाय तिला राहणेसाठी बाभळी आवश्यक आहेत. शिकारी पक्षाकडून तिला बाभळी मुळे संरक्षण मिळत असते.
भविष्यात आपली पिढी टिकावी वाटत असेल तर स्थानिक पातळीवर जैवविविधता वाचली पाहिजे म्हणजेच दक्खनच्या पठारावर बोरी बाभळी वाचल्या पाहिजेत, नाहीतर विनाशाकडे वाटचाल सुरूच आहे आपली, फक्त कोरोना ने विचार करायला संधी दिली आहे एवढंच….लेख लिहण्याचा मूळ उद्देश आहे की आपल्या परिसरातील साधी बाभूळ व साधी बोरीची झाड वाचली पाहिजेत.







