भोपाळ (मध्यप्रदेश) – रामपुर नैकिन येथे मंगळवारी बस 30 फूट खोल कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला. या बसमध्ये जवळपास 54 प्रवासी होती. यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले असून अद्याप 47 प्रवाशी बेपत्ता आहेत.
ही बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. बस कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवले. हे प्रवासी पोहत कालव्याच्या बाहेर पडले. मात्र, उर्वरित 47 प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. यापैकी चौघांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळत आहे. तर उर्वरित लोकांचा सध्या शोध घेतला जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले. ही बस क्रेनच्या साहाय्याने कालव्याच्या बाहेर काढली जात आहे. यामध्ये काही प्रवाशांचे मृतदेह असण्याची शक्यता आहे. बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनेची माहिती घेतली असून जिल्हाधिकाऱ्य़ांशी चर्चा केली आहे.







