कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यल्लुबाई मारुती गावडे (वय 32) असं या महिलेचे नाव असून, बेळगाव जिल्ह्यातील माणिकेरी इथं माहेरी विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली
सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने निराश होऊन यल्लुबाई गावडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. ही घटना 12 फेब्रुवारीला माणिकेरी येथे घडली. या प्रकरणी काकती पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
यल्लुबाई यांचं माहेर माणिकेरी येथे आहे. चंदगड तालुक्यातील सोनारवाडी हे त्यांचं सासर आहे. येथून त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या होत्या. तर अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्जही दाखल केला होती. मात्र, या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या निराशेत होत्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी त्यांना घरी बोलावून घेतलं
त्या माहेरी गेल्या आणि शुक्रवारी रात्री त्यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि स्थानिकांच्या मदतीने यल्लुबाई यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.







