मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – देशात रस्ते आणि वाहतुक कोंडी नेहमीचीच झालेली आहे. यातून लोकांना कधी सुटकारा मिळणार हा खरा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकार वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी नव्या उपायांवर काम करत आहे. अनेकदा चालकांना वाहतुक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो. टोल नाक्यावरील रांगा टाळण्यासाठी मोदी सरकारचे नव्या धोरणांवर काम सुरु आहे. हे धोरण लागू झाले तर रस्त्यावरील वाहतूक वेगवान होणार आहे.
नव्या योजनेनुसार वाहतुक कोंडी झाल्यास वाहनधारकांना टोल भरावा लागणार नाही. देशातील प्रत्येक टोल नाक्यावर प्रत्येक लेनमध्ये एक वेगळ्या रंगाची रेष असणार आहे. टोल नाक्यावर वाहतुक कोंडी झाली आणि वाहनांची रांग रेषेच्या पुढे गेली तर त्या लेनमधील सर्व गाड्या टोलशिवाय सोडाव्या लागणार आहेत. केंद्र सरकार सध्या या योजनेवर काम करत आहे.
टोल नाक्यांपासून किती अंतरावर ही विशिष्ट रेष असणार आहे. त्याबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे. टोल नाका आणि रेष यातील अंतर हे प्रत्येक ठिकाणी वेगळं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विविध टोल नाक्यांवर असणारी वाहतूक आणि लेन्सची संख्या पाहून रेष आखण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.






