चोपडा (संदीप ओली) – गेल्या 2019 – 2020 या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या कापूस, मका ,ज्वारी ,बाजरी ,तूर उडीद आदी पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता अश्या चोपडा तालुक्यातील 8176 शेतकऱ्यांना 22 कोटी 45 लाख 49 हजार 689 रुपये एवढ्या रकमेचा विमा मंजूर झाला आहे .गेल्या 2019 – 2020 या आर्थिक वर्षातील खरीप हंगामातील पिकांची विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर व्हावा यासाठी आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,कृषी मंत्री दादा भुसे व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे विमा मंजूर झाला आहे .संबंधित विमा कंपनीमार्फत दोन हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती चोपडा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे व्यवस्थापक डी बी पाटील यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले यामुळे लाभार्थी शेतकर्यांमधे आनंदाचे वातावरण आहे.







