मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या एका डोळ्याची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. लवकरच दुसऱ्याही डोळ्याची शस्त्रक्रिया होणार असल्याचं त्यांनी चाहत्यांना ब्लॉगमधून सांगितलं होतं. पण आता ते हळूहळू यातून बरे होत आहेत. त्यांनी नुकतीच त्यांची एक कविता चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
त्यांनी त्यांची सध्याची परिस्थिती या कवितेतून सांगितली आहे. ते म्हणतात की, मी दृष्टिहिन असलो तरी दिशाहिन नाही. त्यांनी आपल्या चाहत्यांचे आणि घरच्यांचेही त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या काळजीबद्दल या कवितेच्या माध्यमातून आभार मानले आहेत. त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही या कवितेसोबत आपला फोटो शेअर केला आहे.
याआधी त्यांनी लिहिलं होतं की, “मी हळूहळू बरा होत आहे. अजून दुसऱ्याही डोळ्याची शस्त्रक्रिया होणार आहे. आणि जर सगळं व्यवस्थित पार पडलं तर मी विकास बहलसोबतचा नवा चित्रपट ज्यांचं सध्या तरी नाव गुडबाय असं आहे, त्याचं काम सुरु करु शकेन.”
अमिताभ यांनी या शस्त्रक्रियेची माहिती आपल्या ब्लॉगद्वारेच आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यात त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते. तसंच आपली दृष्टी हळूहळू पूर्ववत होत आहे असंही सांगितलं. शस्त्रक्रियेच्या बातमीनंतर अमिताभ यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. त्यांनी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थनाही ते करत होते.






