ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अनेक प्रकारच्या शक्यता व्यक्त करण्यात येत असताना मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत, असा दावा करत त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संपूर्ण प्रकरणाची एटीएस मार्फत चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात ही कार ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवून अधिक चौकशी करण्यात येत होती. दरम्यान, शुक्रवारी मुंब्रा रेतीबंदर येथे खाडीत मनसुख यांचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
दरम्यान, ‘असे काही होईल, याचा आमचं कुटुंब विचारही करू शकत नाही. आमच्या गाडीची चोरी झाली होती. पतीला चौकशीसाठी पोलिसांचे वेळोवेळी फोन येत होते. पती चौकशीला गेल्यानंतर पतीला संपूर्ण दिवस बसवून ठेवले जात होते. चौकशीमध्ये माझ्या पतीने पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले आहे. गुरुवारीही त्यांना बोलावले होते. मात्र ते गेले ते परत आले नाहीत. रात्री दहा नंतर त्यांचा फोन बंद झाला. आम्ही रात्रभर त्यांची वाट बघितली. मात्र सकाळी देखील घरी न आल्याने आम्ही पोलिसांकडे तक्रार केली’, असे विमला हिरेन यांनी सांगितले.
गुरुवारी कांदिवलीवरून गुन्हे शाखेतून तावडे यांचा त्यांना फोन आला होता आणि घोडबंदर येथे भेटण्यासाठी बोलवले असल्याचे ते बोलले होते, असेही त्यांनी नमूद केले. माझे पती कधी आत्महत्या करूच शकत नाहीत. मात्र,आत्महत्येबाबत अफवा पसरवल्या जात असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली. विमला यांनी दिलेल्या माहितीतून आता नव्याने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही आत्महत्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र विमला यांच्या दाव्याने तपासाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.






