खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगला फार महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी बीडच्या नवरदेवाने अनोखी शक्कल लढवली आहे.
आजवर आपण नवरदेव घोडय़ावर बसून मांडवात पोहोचल्याचे ऐकले आहे. मात्र या नवरदेवाने लग्नासाठी घोडय़ावरून न जाता चक्क उंटावरून जाण्याचा निर्णय घेतल्याने सारेच चकीत झाले. हा विवाह सोहळा बीडमधील साळेगाव येथे संपन्न झाला.
येथील माजी सैनिक असलेल्या महादेव वरपे यांचे सुपुत्र अक्षय वरपे याने लग्नामध्ये वरातीला जाताना उंटावरून जाण्याचा निर्णय घेतला. अक्षय वरपे याचा विवाह ऐश्वर्या रणदिवे हिच्यासोबत पार पडला. बीडमधील या गावात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. अशा परिस्थितीत बाहेरून आलेल्या पाहुण्यांच्या माध्यमातून कोरोना पसरू नये यासाठी अक्षय आणि त्याच्या वडिलांनी विशेष खबरदारी घेतली होती. महत्त्वाचे म्हणजे या विवाह सोहळ्यात पाहुण्यांची संख्या 50 पेक्षा कमी होती.






