नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये असते तर ते आता मुख्यमंत्री झाले असते. पण आता त्यांना भाजपमध्ये शेवटच्या बाकांवर बसावं लागतंय, असं राहुल गांधी म्हणाले. पक्षाच्या युवा शाखेला संघटनेचे महत्त्व सांगत असताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. जर ज्योतिरादित्य शिंदे थांबले असते तर राज्याचे मुख्यंमत्री होऊ शकले असते. पण आता भाजपमध्ये ते बॅकबेंचर आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना बळकट करण्याचा पर्याय होता. तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल, हे आपण त्यांना बोललो होतो. पण त्यांनी दुसरा मार्ग निवडला. मी लिहून देतो, ज्योतिरादित्य तिथे कधीच मुख्यमंत्री होणार नाही. यासाठी त्यांना परत यावं लागेल, असं राहुल गांधी म्हणाले. कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी लढावं आणि कधीच कुणाला घाबरू नका, असं राहुल गांधी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांना म्हणाले.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले होते. काँग्रेसमधील आपल्या स्थानाबाबत ज्योतिरादित्य अस्वस्थ आणि असमाधानी होते. यामुळे गेल्या वर्षी ९ मार्चला ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता. यानंतर दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांपैकी एक होते. जवळपास १८ वर्षे त्यांनी काँग्रेससाठी काम केलं. आपण काँग्रेस का सोडतोय, याचं कारणही ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यावेळी सांगितलं होतं. कमलनाथ सरकारने शेतकरी आणि तरुणांना दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने पक्ष सोडत असल्याचं ज्योतिरादित्य शिंदे त्यावेळी म्हणाले होते.






