कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता यांना आणखी एक झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आमदारांचे पलायन सुरूच आहे. पक्षातील सिंगूरमधील आमदार रवींद्रनाथ भट्टाचार्य यांच्यासह ५ आमदारांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भट्टाचार्य यांच्यासह सोनाली गुहा, जुटू लाहिरी, शीतल कुमार सरदार आणि फुटबॉलपटू दिपेंदु विश्वास या आमदारांचा समावेश आहे.
करोनावरील लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी संपात व्यक्त केला आहे. एक दिवस संपूर्ण देश मोदींच्या नावे होईल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या सर्व २९४ जागांवरील निवडणुका या माझ्यात आणि भाजपध्ये आहेत. आपण पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. दुसरीकडे त्यांच्या पक्षातील ५ आमदारांनी एकाचवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मालदा जिल्ह्यातील हबीबपूरमधील टीएमसीचे माजी उमेदवार सरला मुर्मु यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीने आज सकाळीच त्यांना उमेदवारी नाकारली. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये आणखी एक नाव अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांचेही आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, शुभेंदू अधिकारी आणि मुकुल रॉय यांनी या सर्वांना पक्षाची सदस्यता दिली.
टीएमसीने मालदा जिल्ह्यातील हबीबपूरमधील पक्षाच्या नेते सरला मुर्मु यांना उमेदवारी नाकारली होती. मुर्मु यांच्या ऐवजी प्रदीप बास्की यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मु यांच्या अस्वस्थेतेमुळे उमेदवार बदलल्याचं कारण पक्षाकडून देण्यात आलं. यानंतर सरला मुर्मु यांनी संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश केला.
ममतादीदी मला सोडत असतील तर मग मी त्यांना का सोडू नये? असं दक्षिण २४ परगना येथील ४ वेळा तृणमूलच्या आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी सांगितलं. आपल्याला निवडणूक लढायची नाहीए. पण पक्षात एक सन्मानाचे पद हवे आहे, असं आपण मुकुल रॉय यांना फोनवर सागितलं. त्यांनी होकार दिला आणि आपण भाजपमध्ये प्रवेश केला, असं सोनाली गुहा म्हणाल्या.






