नवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या कुठल्याही समस्येमुळे चिंता करण्याची गरज नाही. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक एकत्र केले आहेत. भारतीय रेल्वेने उपलब्ध सर्व हेल्पलाइन क्रमांकांऐवजी आता १३९ क्रमांक जारी केला आहे. यामुळे प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं आणि रेल्वेशी संपर्क करणं अधिक सोपं होणार आहे.
१३९ या हेल्पलाइन क्रमांकावर आता प्रवाशांना सर्व माहिती आणि तक्रारही करता येणार आहे. विभागीय रेल्वे मंडळंही १३९ क्रमांकाशिवाय दुसरा कुठला हेल्पलाइन क्रमांक आता जारी करणार नाहीत. नवीन क्रमांक हा रेल्वेच्या सुविधांचा उपयोग करणाऱ्या एकीकृत सेवा देईल. सेवा, सुरक्षा, तक्रार, खाद्यपदार्थ आणि सतर्कतेसाठी आता १३९ क्रमांक डायल करता येईल. हा क्रमांक सुरू होताच आधीचे सर्व हेल्पलाइन क्रमांक बंद केले जातील.
१३९ हा हेल्पलाइन क्रमांक वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि आयव्हीआरएस ( इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम ) आधारित आहे. मोबाइल फोन वापरणाऱ्या सर्वांना १३९ क्रमांकावर फोन करता येईल. या क्रमांकावर प्रवासी, ट्रेन संबंधित सखोल माहिती आणि पीएनआर स्थिती, तिकीट (सामान्य आणि तत्काळ ) उपलब्धता, ट्रेन येण्याची वेळ, निघण्याची वेळ, प्रवासाची वेळ जाणून घेण्याच्या वेळेसोबतच आरक्षणासंबंधीची माहिती ही एसएमएसद्वारे मिळवता येईल.






