शिखर शिंगणापुरात संचारबंदी; गुलाल उधळण्यासही मनाई

सोलापुर (विजयकुमार दिवाणजी) – पुणे, सातारा आणि सोलापूर या लगतच्या तिन्ही जिल्ह्यांत करोना संसर्गाच्या वाढत्या आकडेवारीमुळे शैवभक्तांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथे बुधवारपासून दिवस संचार बंदी लागू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीमुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दहिवडीचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

दरवर्षी महाशिवरात्रीला सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापुरात महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सलग तीन दिवस येथे भक्तांची मोठी रीघ असते. प्रशासनाच्या पातळीवर भक्तांना सुविधा पुरविल्या जातात.

गेल्यावर्षी चैत्री यात्रा संपल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत हे मंदिर बंद होते. त्यानंतर त्यात शिथिलता आणण्यात आली होती. मात्र आता पुन्हा करोना वेगाने वाढत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून गर्दी टाळण्यासाठी यासह ग्रामीण भागात यात्रांवर बंधने आणली आहेत. त्यामुळे सध्या शिखर शिंगणापूर, वावरहिरे, डांगीरेवाडी आणि मोही या ठिकाणच्याही महादेव मंदिर परिसरांत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. आता या परिसरात पाच व्यक्तींना एकत्र येण्यास, गुलाल उधळण्यास, पेढे वाटण्यास आणि फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here