हरयाणातील भाजप सरकार स्थिर, काँग्रेसचा अविश्वास ठराव फेटाळला

चंदीगड (हरयाणा) – येथील भाजपचे सरकार तरले आहे. काँग्रेसने विधानसभेत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकाविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. पण या ठरावाच्या बाजूने ३२ तर सरकारच्या बाजूने ५५ मतं पडली. यामुळे विधानसभेत काँग्रेसचा अविश्वास ठराव फेटाळला गेला आहे.

विधानसभेत काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. सभागृहात काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावाचे समर्थन केले. तर भाजप आणि जननायक जनता पार्टीचे आमदार अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात उभे झाले.

अविश्वास ठरावावर जवळपास ६ तास जोरदार चर्चा झाली. यानंतर ५ वाजून २ मिनिटांनी विधानसभेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आलं. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने ३२ आमदारांची मत पडली. यात ३० काँग्रेस आणि दोन अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तर अविश्वास ठरावाविरोधात ५५ आमदारांची मतं मिळाली. विधानसभा अध्यक्षांचे मत मोजण्यात आले नाही. यात भाजपचे ४० आणि जजपाचे १० आमदार आणि अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

हरयाणा विधानसभेत एकूण ९० आमदार आहेत. यातील ८८ आमदार अविश्वास ठरावावेळी उपस्थित होते. एक आमदार अभय चौटाला यांनी राजीनामा दिला आहे. तर आमदार प्रदीप चौधरी यांची निलंबित करण्यात आलं होतं. हरयाणा विधानसभेत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी अविश्वास ठराव मांडला. हुड्डा यांनी सभागृहात सरकारवर मोठे आरोप केले. तर काँग्रेसला हवे तसे काम न केल्यास सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जातो, असा टोला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here