पुढील तिन्ही टी-२० सामने प्रेक्षकांविना; क्रिकेट प्रेमींचा हिरमोड

अहमदाबाद – वाढत्या करोनाचा फटका भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून, तीन सामने होणार आहेत. मात्र, गुजरातमध्येही करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेत भर घातली आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढील तिन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत.

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. गुजरातमध्येही करोनानं डोकं वर काढलं असून, त्याचा फटका भारत आणि इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. राज्यात दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येचं गांभीर्य लक्षात घेत गुजरात क्रिकेट मंडळाने भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित टी-२० सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामने होत असून, दोन सामने झाले आहेत. तर तीन सामने होणार आहेत. १६ मार्च, १८ मार्च आणि २० मार्च रोजी उर्वरित तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली होती. मात्र, पुन्हा एकदा करोना संक्रमण वाढल्याने प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रेक्षकांनी सामन्याची तिकीट घेतलेली आहेत. त्यांना पैसे परत करण्यात येतील, असं गुजरात क्रिकेट मंडळाने म्हटलं आहे.

गुजरातमध्ये करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेत भर टाकली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ९०० नवी करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यांप्रमाणेच गुजरात सरकारनेही करोना रुग्णांची संख्या वाढत असलेल्या ८ भागांमध्ये काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. विशेषतः रेस्तराँ, भोजनालये रात्री दहानंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here