(योगेश शुक्ल)
एक होती चिऊ आणि एक होता काऊ
चिऊच घर होत मेणाच आणि
काऊच घर होत शेणाच..
एकदा काय झाल खुप पाऊस आला
आणि काऊच घर वाहून गेल..
हल्लीच्या या मिकी-माऊस, प्लुटोच्या जगात लहान मुलांना ही गोष्ट
कुणी सांगत असेल तर शंकाच आहे; या गोष्टीच अस्तित्व जस अस्पष्ट,
अंधुक होऊ लागलय तसच त्यामधील पात्रांच सुध्धा..!
गॊष्टीत जरी काऊच घर वाहून गेल असल तरी सध्याच वास्तव वेगळ
आहे आणि चिऊ-काऊच अस्तित्व धोक्यात आलेल आहे त्यातही चिऊच..
ही चिऊताईची अगतिकता लक्षात घेऊन पर्यावरण प्रेमींनी जागतिक चिमणी दिवस साजरा करायच ठरवल.
विकासाच्या नावाखाली झालेली वृक्षतोड, फ़ळ-धान्यात वापरण्यात येणार्या किटकनाशकांचे अतिरिक्त प्रमाण, कॉंक्रीटीकरण, कारखाने, मोबाईलरुपी वाढलेल्या ’चिमण्या’ यांचा हा परीणाम आणि कमी झालेल चिमण्यांच प्रमाण
ही त्याची सुरुवात. मागील ८-१० वर्षांपूर्वीचा काळ बघीतला तर निश्चितच चिमण्यांच प्रमाण कमी झालेल आढळत. सकाळचा कमी झालेला चिमण्यांचा आवाज इमारतींच्या कानाकोपर्यात दिसणारी, विजेच्या खांबावरील कमी झालेली चिमण्यांची घरटी हेच दर्शवीतात. चिमण्यांच कमी झालेल प्रमाण हे खरच महत्वाच आहे का? तर नक्कीच आहे. या मागचा मह्त्वाचा आणि स्वार्थी मुद्दा असा की आपल्या अवति-भवति असणारे जीव हे केवळ प्राणि-पक्षी नसुन ते नैसर्गकीकतेचे मापक आहेत !
एखादा पक्षी-प्राणि एखादा भाग सोडुन जातो किंवा त्याचे प्रमाण कमी होते तेव्हा ही गोष्ट निसर्गात झालेला नको तो बदल दर्शवीत असते. त्या भागातील मूळ नैसर्गिकपणा कमी झालाय, आता हे ठिकाण रहाण्यास योग्य नाही त्याच वेळी अशा गोष्टी घडतात.
म्हणुन काऊच्या मदतीसाठी दरवाजा उघडणारी चिऊताई माणसाला मदत करायला म्हणते आहे ’माणसा माणसा डोळे उघड’






