मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप करण्यात आले. त्यामुळे या सर्व घटेनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, याची सर्वत्र चर्चा होत असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
परमवीर सिंह यांच्या नावाने पाठवण्यात आलेला ईमेल नक्की त्यांनीच पाठवला आहे का, याबाबतच सर्वात आधी तपास करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.
‘गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमवीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परमवीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परमवीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,’ अशी माहिती CMO कडून देण्यात आली आहे.
‘वास्तविक पाहता परमवीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते,’ असंही मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, या सर्व घटनाक्रमामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे हे पत्र जर खरं असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याची नक्की कशी दखल घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जातो की त्यांना तपासाअंती क्लीनचिट दिली जाणार, हेदेखील आगामी काळातच स्पष्ट होईल.
आपल्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही लगेच स्पष्टीकरण दिलं आहे.’स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे,’ असा दावा अनिल देशमुख यांनी ट्वीट करत केला आहे.







