आसाममधील प्रत्येक महिलेला मासिक २००० रुपये देण्याचे राहुल गांधीं याचं आश्वासन

जोरहाट (आसाम) – विधानसभा निवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी आज राज्याच्या दौऱ्यावर आहेत. जोरहाटमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी काही घोषणाही केल्या आहेत. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास सर्व कुटुंबांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज तर राज्यातील प्रत्येक महिलेला २००० रुपये प्रती महिना देण्याचं आश्वासनही राहुल गांधी यांनी मंचावरून दिलंय.

भाजपकडून संस्कृती, भाषा इतिहास आणि आसामच्या बंधुत्वावर हल्ला केला जातोय. आम्ही मात्र घृणा मिटवून राज्यात शांती आणू, असा शब्दही राहुल गांधींनी जनतेला दिलाय. ‘कोणताही धर्म शत्रुत्वाची, हिंसेची शिकवण देत नाही. घृणा पसरवावी असं हिंदू धर्मात म्हटलं गेलंय का? भाजपनं केवळ समाजाला विभागण्यासाठी घृणेचा वापर केला. त्यांना जे करायचं असेल ते करू द्या परंतु काँग्रेस मात्र प्रेम आणि सुसंवाद वाढवण्यावर भर देईल’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

राज्यात नागरिकत्व विरोधी कायदा (CAA) लागू केला जाणार नाही, चहा बागांच्या मजुरांना कमीत कमी प्रती दिन ३६५ रुपये रोजगार मिळवून देणार, प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट वीज मोफत देणार, राज्याच्या प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला २००० रुपये खर्चासाठी देणार, राज्यात बेरोजगारी दूर करण्यासाठी ५ लाख नोकऱ्यांची निर्मिती केली जाईल, अशी पाच महत्त्वाची आश्वासनं राहुल गांधी यांनी जनतेला दिली आहेत. शुक्रवारीही राहुल गांधी यांनी या ‘पाच गॅरंटी’ जनतेला दिल्या होत्या. काल ते दिब्रुगड जिल्ह्यातील लाहोवल महाविद्यालयातील विद्यार्थी, चाबुआमध्ये चहा कामगार आणि डुमडुमामध्ये एका निवडणूक सभेला संबोधताना या घोषणा केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here