जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी खळबळजनक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावाच त्यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या लेटरबॉम्ब प्रकरणी आता विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी याविषयी प्रतिक्रिया देत विरोधीपक्षावरच आरोप केले आहे. ‘आकसापोटी असे आरोप केले जाऊ शकतात. जे काय याविषयीचे सत्य असेल तर चौकशीमध्ये समोर येईल. तसेच या प्रकरणामध्ये जे काही असेल त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देखमुख हे स्पष्ट करतील’ असेही एकनाथराव खडसेंनी म्हटले आहे.






