ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी -राज ठाकरे

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन अनिल देशमुख यांनी तत्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

परमबीर सिंह यांच्या आरोपांवर राज ठाकरे म्हणाले- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते असे गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली होती. एवढेच नव्हे, तर हे पैसे कुठून आणि कसे घ्यायचे याची प्लॅनिंग सुद्धा वाझेंना गृहमंत्र्यांनी दिली होती असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अँटिलिया प्रकरणात अटकेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची आधी CIU मधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. याच प्रकरणी विरोधकांच्या दबावानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची देखील बदली करण्यात आली. याच बदलीनंतर आता परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकले आहे.

दरम्यान सोशल मिडीयावर आता या घटनेवर मिम्स फिरायला लागले असून, या पत्राची चर्चा महाराष्ट्रभर सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here