मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी खळबळजनक आरोप केले आहेत.
अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आता यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी खोचक ट्विट केले आहे.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021
अमृता फडणवीस यांनी गृहमंत्र्यांवर करण्यात आलेल्या आरोपांविषयी केवळ दोन ओळींमध्ये ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर या दोन ओळी शेअर केल्या आहेत. शायरीच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणावर टीका केली आहे. ‘बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?’ असे ट्विट करत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी या ट्विट खाली सचिन वाझे आणि टार्गेट 100 कोटी असे हॅशटॅग दिले आहेत.
दरम्यान आता अमृता फडणवीसांनी ट्विटमध्ये केलेला ‘बादशाह’ हा उल्लेख कोणासाठी केला आहे? हा बादशाह नेमका कोण? या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार कोण? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर हे पैसे कुठून आणि कसे घ्यायचे याची प्लॅनिंग सुद्धा वाझेंना गृहमंत्र्यांनी दिली होती असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






