मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलिसांच्या बँक खात्यावरून खोचक सवाल केला होता. जगताप यांच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी उत्तर दिलं आहे. ‘मला डिवचायचं नाही’, असा इशाराही अमृता यांनी जगताप यांना दिला आहे.
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. सरकारी भ्रष्टाचारी असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यावरून भाई जगताप यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. ‘सत्तेत असताना फडणवीसांनी राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती? फडणवीसांनी तब्बल २१ जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली होती. त्यांना काय बोलणार? त्यांचं डोकं ठिकाणावर नाहीए,’ असं जगताप म्हणाले होते.
ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !
पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती !
लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय ! @BhaiJagtap1 https://t.co/tny1xz4cMF— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 22, 2021
जगताप यांनी बँक खात्यांबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळं अमृता फडणवीस संतापल्या आहेत. भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख करत अमृता फडणवीसांनी त्यांना इशारा दिला आहे. ‘ए भाई, तू जो कोणी असशील. माझ्यावर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही यूटीआय व अॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचं न्हाय,’ असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.






