नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी देण्यास नकार दिला आहे. परमबीर सिंह आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यांचे वकील आजच उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील. दुसरीकडे राज्य सरकारही परमबीर सिंह यांच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले की, जे आरोप तुम्ही केले आहेत ते गंभीर आहेत यात शंका नाही. मात्र तुम्ही उच्च न्यायालयात का गेले नाही? पहिले तुम्ही हायकोर्टात जायला हवे होते. परमबीर यांचे वकील मुकुल रोहतगी यांना सर्वोच्च न्यायालयाने हे देखील विचारले की, तुम्ही या प्रकरणी संबंधीत विभागाला पक्षाला का सांगितले नाही? परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.
आपल्या याचिकेमध्ये परमबीर सिंहांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप लावत या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. याचिकेमध्ये सिंहांनी होमगार्ड डिपार्टमेंटसाठी आपल्या ट्रान्सफरलाही आव्हान दिले होते. राज्य सरकारचा हा आदेश बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला.
अनिल देशमुख यांच्या घराबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याची तपासणी करण्याची मागणी याचिकेत केली आहे. सिंह यांची याचिका न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर नोंदवण्यात आली आहे.






