महाराष्ट्र कोरोना:राज्यात 36,902 नवे रुग्ण; उद्यापासून रात्रीची जमावबंदी

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवादानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक झाला. दिवसभरात ३६,९०२ नवे रुग्ण, तर ११२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. १७,०१९ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाइलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय, अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मराठवाड्यात ४,६९७ नवे रुग्ण, तर ५७ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी औरंगाबादेत १७८७, जालना ४१५, परभणी २६३, हिंगोली १८६, नांदेड ९७०, लातूर ५३८, उस्मानाबाद १५५, बीडमध्ये ३८३ नवे रुग्ण सापडले. विदर्भात शुक्रवारी ६५ जणांचा मृत्यू झाला, तर ७६५६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास नाइलाजास्तव आठवडाभरात निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. काेराेना आढावा बैठकीनंतर आयाेजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एमपीएससी व १० वी तसेच १२वी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here