कल्याण-डोंबिवलीत वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय; व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर आयुक्तांनी आदेश घेतला मागे

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी शनिवारी संध्याकाळी मागे घेतला. यामुळे आज (रविवारी) होळी दिवशी कल्याण व डोंबिवली या जुळ्या शहरात सर्व दुकाने बाजारपेठा सुरू राहणार आहेत तर सोमवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद राहतील. होळी, रंगपंचमी सणाच्या पार्श्वभमीवर हा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून घेतल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी सर्व आस्थापना (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी घेतला होता. मात्र, या निर्णयाला विरोध करत व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. दिवसभर आंदोलन करत व्यापाऱ्यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने अखेर आयुक्तांनी निर्णयात शिथिलता देत रविवारऐवजी सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

ठाणे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी शनिवारीही तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळले. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली असून गुरुवारी ३ हजार ३१८, शुक्रवारी ३ हजार २१८ नवीन रुग्णांची वाढ झाली होती. शनिवारी दिवसभरात नवीन ३ हजार २२५ रुग्णांची वाढ झाली असून ठाणे पालिका क्षेत्रात ९१८, कल्याण-डोंबिवली ८२९, नवी मुंबई ७७०, मिरा-भाईंदर १७२, उल्हासनगर १२२, भिवंडी ५९, अंबरनाथ १३१, बदलापूर १३०, ठाणे ग्रामीणमध्ये ९४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधीतांची एकूण संख्या ३ लाख ५ हजार ७८४ वर गेली आहे. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे आतापर्यंत ६ हजार ४३२ रुग्ण दगावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here