नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – कबुतर पकडण्याच्या क्षुल्लक वादातून चाकूने वार करीत २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गिट्टीखदामधील गवळीपुरा भागात घडली.
अक्षय सिद्धार्थ बागडे (वय २५, रा. गवळीपुरा) असे मृताचे नाव आहे. तो पेंटिंगची कामे करायचा. गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून राजा ऊर्फ अरमान ऊर्फ अजहर जाफर शेख (वय २७, रा. गवळीपुरा) या मारेकऱ्याला अटक केली. तो ऑटोचालक आहे. राजा व अक्षय शेजारी राहातात. दोघांकडे कबुतरे आहेत. एकमेकांची कबुतरे पकडण्यावरून शुक्रवारी दोघांमध्ये वाद झाला.
राजा संतापला, तो घरात गेला. चाकू आणून त्याने अक्षयच्या छातीवर सपासप वार केले. अक्षयचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून अक्षयचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून राजाला अटक केली.






