मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – लोकांनी करोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत, तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नसेल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोध अधिक गतिमान करण्याची गरज असून विशेषत: छोट्या शहरांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान उभे राहिले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील एकूण परिस्थिती पाहता राज्यात ई आयसीयू वर भर देण्यासाठी पाउले उचलण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
राज्यात करोनाला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत टास्क फोर्सची बैठक पार पडली. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले की महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही चांगले झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे. ज्याठिकाणी संसर्ग वाढ जास्त आहे तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचनाही भूषण यांनी केल्याचे ते म्हणाले.
लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये व समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सूचना प्रशासनास देण्यात येत आहेत, तसेच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल, असे कुंटे म्हणाले.






