अमरावती (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – मेळघाटातील वनरक्षक दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अमरावती येथून बदली करण्यात आलेले अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे. गुगामल वन्यजीव परिक्षेत्राच्या वनरक्षक दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी मेळघाटच्या हरिसाल येथे स्वतःच्या पिस्तुलने गोळी झाडून जीवन संपवले होते. याप्रकरणी उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.
दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. दीपाली चव्हाण यांना विनोद कुमार यांनी त्रास दिला होता. याविषयीची तक्रार रेड्डी यांच्याकडे होती. मात्र माहिती असूनही त्यांनी कारवाई न केल्याचा आरोप आहे. आज, मंगळवारी अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात भाजपकडून ठिया आंदोलन करण्यात आले. रेड्डी यांच्या निलंबन व अटकेची मागणी करण्यात आली. यादरम्यान अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रेड्डीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. यानंतर आज दुपारी श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले.






