चंद्रपूर (प्रतिनिधी) – गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सूर्य तापण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून विदर्भ आता हळूहळू तापू लागला आहे. दरम्यान, मंगळवारी चंद्रपूर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले.
मंगळवारी देशात ओडिशातील भरिपदा येथे ४४.६ अंश तर त्याखालोखाल चंद्रपूरात ४३.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. त्याखालोखाल ब्रह्मपुरी येथे ४३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. शहरातसुद्धा पारा ४१.९ अंशांपर्यंत पोहोचला होता. शहरात दिवसभर उष्णता जाणवत होती. रात्रीसुद्धा त्यातून फारसा दिलासा मिळालेला नव्हता. त्यामुळे अनेक घरांमध्ये कुलर सुरू झालेत.
विदर्भात वाशिम येथे ४१ इतक्या सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोद करण्यात आली. यावरून विदर्भातील उष्णतेचा अंदाज येतो. गुरुवारपासून शहरातील वातावरण अंशत: ढगाळ असेल. परंतु, तरीही पुढील काही दिवस तापमानाची ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.






