मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – आई माझी काळूबाई’ ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेसंदर्भातील विविध वाद आणि चर्चा अजूनही सुरूच आहे.आता पुन्हा ही मालिका का चर्चेत आली आहे.
मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेत मुख्य नायिका अर्थात ‘आर्या’ ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र, प्राजक्ताची वागणुक व्यवस्थित नसल्याचे सांगत निर्मात्या अलका कुबल यांच्या निर्णयानुसार तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले. यानंतर प्राजक्ताच्या जागी ‘मराठी बिग बॉस’ फेम वीणा जगताप हिची वर्णी लागली होती. मात्र, आता वीणाने देखील या मालिकेला गुडबाय म्हटले असून मालिकेत पुन्हा एकदा आर्या बदलणार आहे. आर्याच्या भूमिकेत आता नवा चेहरा समोर येणार आहे. हा चेहरा मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘फ्रेशर्स’, ‘अग्निहोत्र 2’ या सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री रश्मी अनपट आता या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.
‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शुटिंग शेड्युलमुळे वीणा सतत आजारी पडत होती. त्यामुळे वीणाने ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे या मालिकेमुळे शिव-वीणाच्या नात्यात दुरावा आल्याचे त्यांचे चाहते म्हणत आहेत. आता वीणाच्या जागी रश्मी अनपट ही भूमिका साकारणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा या मालिकेतील आर्याच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट झालीय, हे समोर येतेय.
एका भूमिकेसाठी सतत अभिनेत्री बदलणे ही गोष्ट खटकत असली, तरी आता रश्मी या भूमिकेतून प्रेक्षकांना किती पसंत पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






