तब्बल वर्षभरानंतर ‘गतिमान एक्सप्रेस’ रुळावर

नवी दिल्ली – देशातील सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाणारी ‘गतीमान एक्सप्रेस’ तब्बल वर्षभराच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुळावर परतलीय. यामुळे दिल्ली – आग्रा – ग्वालियर – झासी या मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुकर, अधिक गतमान आणि आरामदायक झालाय.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी देशात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि प्रवासी नियमांमुळे इतर रेल्वेगाड्यांसोबतच गतिमान एक्सप्रेस गेल्या वर्षभरापासून यार्डातच उभी होती. भारतीय रेल्वेनं १ एप्रिल २०२१ रोजी या रेल्वेची सेवा पुन्हा एकदा सुरू केलीय. या रेल्वेमुळे दिल्ली ते आग्रा हा प्रवास केवळ १ तास ४० मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. तर ही रेल्वे दिल्ली ते उत्तर प्रदेशातील झाशी असा ४०३ किलोमीटरचा प्रवास केवळ ४ तास २५ मिनिटांत पूर्ण करते.

दिल्लीहून रवाना होणारी ही रेल्वे आग्रा, ग्वालियर, झासी असा प्रवास करते. रेल्वे मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार, गतिमान एक्सप्रेस आता शुक्रवार सोडून आठवड्यांतील सहा दिवस नियमित रुपात सुरू राहणार आहे.रेल्वे प्रवास सुरू झाला असला तरी रेल्वे प्रवाशांना करोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. ही रेल्वे ३० जूनपर्यंत नियमित रुपात चालणार आहे. त्यानंतर ही रेल्वे सुरू ठेवावी किंवा पुन्हा एकदा बंद करावी, याबाबत पुनर्विचार केला जाईल.

‘गतिमान एक्सप्रेस’ दिल्लीच्या हजरत निजामुद्दीनहून सकाळी ८.१० वाजता रवाना होईल. ती सकाळी ९.५० वाजता आग्रा कॅन्टोन्मेंटला तर दुपारी १२.३५ वाजता झासीला पोहचेल. परतीच्या प्रवासात हीच रेल्वे दुपारी ३.०५ वाजता झासीहून ही रेल्वे निघेल आणि सायंकाळी ७.३० वाजता हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला दाखल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here