खामगाव (प्रतिनिधी) – शहराच्या निर्मल चौकात आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान दोन रिक्षा चालकात प्रवासी बसविण्यावरून झालेल्या वादातून एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रवाशी घेऊन जाण्याच्या कारणावरुन ऑटो चालकांमध्ये वाद होवून एकाने दुसऱ्या ऑटो चालकाला धारधार चाकूने भोसकले. यात हा रिक्षाचालक गतप्राण झाला.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निर्मल टर्निंग जवळील ऑटो स्टॉपवर मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण (४३) व अजय विनायक आवटे (४०) (दोघेही सती फैलचे रहिवासी) या दोघांमध्ये सायंकाळी प्रवाशी घेऊन जाण्यावरून वाद सुरू झाला. इतर रिक्षाचालकांनी दोघांमध्ये समजूत घातल्याने हा वाद निवळला. परंतु, काही वेळानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला आणि मेहरसिंग चव्हाण याने त्याच्या जवळील धारधार चाकूने अजय आवटे याच्या पोटामध्ये वार केला. यावेळी अजय आवटे हा रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला.
दरम्यान आरोपी मेहरसिंग चव्हाण यानेच अजय आवटे यास स्वतःच्या ऑटोमध्येच टाकून तातडीने उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल हुड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून सामान्य रुग्णालय येथून पोलिसांनी आरोपी मेहरसिंग चव्हाण यास रुग्णालय आवारातून ताब्यात घेतले. दरम्यान नागरिकांनी सामान्य रूग्णालय व निर्मल टर्निंग परिसरात मोठी गर्दी केली होती.






