मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यातील करोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या टिकेला सडेतोड उत्तरे दिली. विशेषत: मुख्यमंत्र्यांना लॉकडाउनऐवजी आरोग्यसुविधा वाढण्याचा सल्ला देणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही त्यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री आपल्या संबोधनात म्हणाले की, ‘एका उद्योगपतीने सांगितलंय की लॉकडाउन लावण्याऐवजी सुविधा वाढवा. आरोग्यसुविधा आपण देतच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधेत वाढ करत आलो आहोत. अजूनही ती वाढवत आहोत. पण मुद्दा असा येतो की हे जे काय आपल्याला सल्ले देत आहेत त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो की, उद्योगपतीना (सगळ्या उद्योगपतींना नाही, तर ज्यांनी करोनाबाबत सल्ला दिला आहे त्यांना) सांगतो की ते म्हणाले आरोग्य सुविधा वाढवा… तर आम्ही वाढवतो, बेड्स वाढवतो, सगळं वाढवतो. पण कृपा करून मला रोज किमान ५० डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा.’
‘याचं कारण म्हणजे नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे आरोग्यसुविधा नाहीत. त्यात व्हेंटिलेटर असेल तर व्हेटिंलेटर वापरणारे तज्ज्ञ लागतात. ऑक्सिजन किती प्रमाणात द्यायचा यासाठी देखील त्या विषयातील तज्ज्ञ लागतो. रेमडेसीवीर जरी द्यायचं झालं तरी ते कसं दिलं पाहिजे हे समजणारा डॉक्टर लागतो’, असे मुद्दे मांडतानाच हे तज्ज्ञ लोक आणि डॉक्टर्स कुठून आणायची?, असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.
लॉकडाउन विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘काही लोक सांगतात की लॉकडाउन लागू केला तर आम्ही रस्त्यावर उतरू. माझं म्हणणं आहे की जरूर उतरा. उतरलंच पाहिजे. पण ते लॉकडाउनच्या विरोधात नाही, तर लॉकडाउन होऊ नये म्हणून करोनाच्या विरुद्ध तुम्ही उतरा. डॉक्टर्सना मदत करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा. ज्यांच्या कुटुंबातील कर्त्या लोकांचा मृत्यू झाला आहे अशा कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावर उतरा. सेवा करण्यासाठी रस्त्यावर उतरा. यंत्रणेला मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा. उतराच…’, असे सांगत आता आपल्याला हातात हात घालून लढाऊ लढावी लागणार आहे, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले आहे.
काही लोक म्हणतात मास्क काय लावतो तू, पण मास्क न लावण्यात शौर्य काय आहे, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला दिला. म्हणे मी मास्क लावणार नाही. काय शूर आहेस का?, असे सांगत मास्क न वापरणं यात शूरता नाही. मास्क लावण्याला लाजायची गरज नाही. कृपा करून मास्क लावा,असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला ‘आयएफएसए’ देणार पाच लाखांचा निधी
वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – वरिष्ठांच्या जाचामुळे आत्महत्या केलेल्या दीपाली चव्हाण या वनपरिक्षेत्र अधिकार्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याच्या निर्णय इंडियन फ़ॉरेस्ट सर्व्हिस असोसिएशन या वन विभागातील अधिकार्यांच्या संघटनेने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणात भारतीय वनसेवेच्या अधिकार्यांना टीका सहन करावी लागली. दीपाली यांच्या मृत्युनंतर तब्बल आठ दिवसांनी वनाधिकार्यांच्या संघटनेने या विषयावर बैठक घेतली. त्यामध्ये, अधिकार्यांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये निधी संकलित करून पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारच्या घटनांमुळे विभागातील वातावरण बिघडू नये. भारतीय वन सेवा तसेच राज्य सेवा अशा दोन्ही अधिकार्यांनी आपल्याकडील कर्मचार्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा. या घटनेमुळे मनोबल खचू देऊ नये. तसेच भारतीय वन सेवेतील अधिकारी विरुद्ध इतर असे स्वरुपही येऊ नये, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या बैठकीत काही अधिकार्यांनी चव्हाण प्रकरणात निलंबित झालेले एम.एस.रेड्डी यांना आताच दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती आहे. मात्र, शिवकुमार यांचे वर्तन चुकीचे होते याबाबत सर्वांचे एकमत असल्याचे बैठकीला उपस्थित एका वरिष्ठ वनाधिकार्याने सांगितले.






