संभाव्य लॉकडाऊनच्या चर्चेमुळे राज्यातल्या कांद्याचा झाला वांदा

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – मुंख्यमंत्र्यांनी दिलेल्या संभाव्य लॉकडाऊनच्या चर्चेमुळे राज्यातल्या कांदा उत्पादकांच्या कांद्याचा वांदा झाला आहे. लॉकडाऊन लागलं तर नाशवंत माल असलेला कांदा ठेवायचा कुठं, असा प्रश्न पडलेल्या शेतकऱ्यांनी जसा आहे तसा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात समित्यांत आणला. त्यामुळं शेअर मार्केटचा निर्देशांक कोसळावा तसा सोलापुरात कांद्याचा भाव कोसळला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संभाव्य लॉकडाऊनचा इशारा दिल्यामुळे कृषीमालाच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. चांगल्या भावाची अपेक्षा असल्याने जपलेल्या अन पिकवलेल्या फळ आणि भाजीपाल्याचे करायचे काय असा प्रश्न पडलेल्या शेतकऱ्यांनी आपापला कृषी माल बाजारात आणला. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा झाल्याने शेतीमालाचे भाव पडले आहेत.

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १०० ते १२५ ट्रक कांद्याची आवक होते. मात्र काल मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर धास्तावलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीत आणला. त्यामुळं बीड, नासिक,पुणे, सोलापूर आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या ३५० ट्रक कांद्याची आवक झाली अन कांद्याचे भाव पडले. ते निम्म्यावर आले. म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी २५०० ते ३००० रूपयांच्या घरात असणारा कांदा लॉकडाऊनची चर्चा सुरु होताच १५०० रुपयांपर्यंत घसरला. किंबहुना व्यापाऱ्यांनी तो कमी भावात खरेदी केला. पण काल मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर तो हजार रुपयांच्याही खाली आला आहे. त्यामुळं राज्यात कुठल्याही क्षणी लॉकडाउनच्या भितीपोटी शेतकऱ्यांच्या कांद्याचा वांदा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here