पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मोहोळ शहराला नवीन बायपास रस्ता (वळण रस्ता) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या आग्रही मागणीची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने (MoRTH) या प्रस्तावावर तातडीने तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या मोहोळ ते बसवनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ हा शहराच्या अंतर्गत भागातून जातो. यामुळे शहरात अवजड वाहनांची प्रचंड ये-जा सुरू असते. परिणामी, दररोज होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांचा मनस्ताप कमालीचा वाढला होता.
खासदार प्रणिती शिंदे यांनी ६ जून २०२६ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ‘ग्रीनफिल्ड अलाइनमेंट’नुसार बायपास रस्त्याची मागणी केली होती. यावर तातडीने पाऊल उचलत मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी ८ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिव आणि संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.








