मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाउन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. राज्य सरकारकडून सातत्याने आवाहन केल्यानंतरही लोक ऐकत नाहीत. पुढचे दोन दिवस असेच आवाहन केले जाईल. काँग्रेसची भूमिका लॉकडाउन लागू नये अशीच आहे, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर इलाज नाही, अशी हतबलताही शेख यांनी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून आपण जे प्रतिबंध लावले आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री स्वत: लोकांना आवाहन करून मास्क लावण्यासाठी तसेच गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करत आहेत. निर्बंध लावत-लावत आता आपण इथवर पोहोचलो आहे. आणखी किती निर्बंध लावायचे आहेत? आता हा शेवटचा टप्पा आला आहे. आणखी किती कठोर बनायचे? ती मान्यताही संपली आहे, अशा शब्दांत त्यांनी हतबलता व्यक्त केली.
आता राज्य सरकारकडून शेवटचा प्रयत्न केला जाईल. मुंबईत लॉकडाउन लावण्याची सरकारची मानसिकता नाही. पण लोकांच्या जीवाचा प्रश्न असेल तर राज्य सरकारकडे दुसरा पर्याय नाही. अजून आम्ही लोकांना विनंती करत आहे. पुढचे दोन दिवस मार्केटमध्ये जाऊन निवेदन दिले जाईल. आम्हाला मजबूर करू नका, असे जनतेला आवाहन करणार असल्याचेही अस्लम शेख यांनी सांगितले.






