पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ना.जयंत पाटील यांचे धक्कादायक विधान
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कडक लॉकडाऊनची भाषा करत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनतेला बुचकळ्यात टाकणारं वक्तव्य केलंय.
पंढरपूर तालुक्यातील रांझणीच्या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी,”तुमचे सर्वांचे चेहरे पाहून जगात करोना नाही, असं मला वाटतंय म्हणून मी पण मास्क काढून बोलतो” असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं करोनासारख्या गंभीर प्रश्नावर राज्य मंत्रीमंडळातीलच मंत्री असं विधान करत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
करोनाचा फैलाव हाताबाहेर जात आहे. औषध आणि रुग्णांसाठी बेड्सची अपुरी व्यवस्था अश्या समस्यांचा सामना खुद्द सोलापूर जिल्ह्यात आणि शहरात जाणवत आहे. त्याच जिल्ह्यात पंढरपूर विधानसभा पोटनिवणुकीच्या निमित्ताने आलेल्या जयंत पाटील यांनी करोनाविषयी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं असून सरकारच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.






