मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवे गृहमंत्री असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर आज निर्णय देण्यात आला. त्यात हायकोर्टाने देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी १५ दिवसांत पूर्ण करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाने महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसला. त्याचवेळी वेगाने राजकीय घडामोडी घडल्या व देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. नैतिकतेच्या आधारावर मी पदावरून दूर होत आहे, असे देशमुख यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा नवा गृहमंत्री कोण असणार, शरद पवार राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याकडे हे महत्त्वाचं खातं सोपवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. त्यात दिलीप वळसे पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. वळसे पाटील यांच्याच नावाला शरद पवार यांची पहिली पसंती असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत होते. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली. त्यानुसार राज्यपालांनीही मंजुरी दिली आहे.






