गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळावं म्हणून कायम झटणारे कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन झालं आहे. गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळावं म्हणून कायम झटणारे दत्ता इस्वलकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षामुळे हजारो गिरणी कामगारांना घरं मिळाली मात्र लाखो कामगारांच्या घरांसाठी ते झगडत होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनंही केली. त्यांची संपूर्ण हयात या प्रश्नात खर्च झाली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

मुंबईत गिरणी कामगारांच्या तीन पिढ्या कापड उद्योगासाठी राबल्या. मुंबईच्या जडणघडणीत त्यांचा वाटा सिंहाचा आहे. पहिल्यापासून कामगार हा कष्टकरी होता. 1982 मध्ये झालेला संप हा गिरणी कामगारांसाठी काळा अध्याय ठरला. काही जण गावी गेले, काही जण मुंबईत राहून नव्याने कष्ट करू लागले. भाज्या विकणे, वडा पाव विकणे असे व्यवसाय काहीजणांनी सुरू केले.

कुणी हात गाडीवर मीठ विकूनही उदरनिर्वाह चालवला. काही कामगारांवर आत्महत्या करण्याचीही वेळ ओढवली. कामगार लढा देत राहिला, त्याचं जगणं जगत राहिला. या कामगारांच्या विचारांना दिशा देण्याचं काम दत्ता इस्वलकर यांनी केलं. त्यांच्या संघर्षाचा ते आवाज झाले. आज त्या संघर्षाचा बुलंद आवाज शांत झाला आहे. दत्ता इस्वलकर यांना समाजभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. 2 मार्च 2020 ला म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या घरासाठीची सोडत दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here