मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह मुंबईतही आज कोराना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेले दोन दिवस राज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे लसीचा तुटवडा असल्याची माहिती देत आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईत लसींचा साठा कमी असून तीन दिवस पुरतील इतका साठा शिल्लक असल्याचं म्हटलं होतं. या गोष्टीचा परिणाम असा झाला की, मुंबईच्या सर्वात मोठ्या बीकेसी लसीकरण केंद्रावर आज लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.
सध्या या लसीकरण केंद्रावर दोन टप्प्यांत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी एक ते रात्री 9 अशा दोन टप्प्यांत दिवसभरात सुमारे साडेपाच हजार नागरिकांना लसीकरण केले जाते. त्यामुळे या लसीकरण केंद्राला दररोज सुमारे साडेपाच हजार लसी पोहोचवल्या जातात. आज सकाळी या केंद्रावर साडेसहा वाजे पासूनच नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली आणि कधी नव्हे ते लसीकरण केंद्राच्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही ठिकाणी नागरिकांसाठी करण्यात आलेली बैठकीची व्यवस्था तोकडी पडली.
इतकंच नाही तर उर्वरित लोकांनी उन्हातान्हात लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. या लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉक्टर राजेश ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवसाचे लसीकरण पूर्ण होईल इतका साठा उपलब्ध आहे. परंतु रोजच्या तुलनेत आज अधिक नागरिक येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. साडेपाच हजारापेक्षा जास्त लसी द्याव्या लागल्या तर मात्र थोडा तुटवडा जाणवू शकेल. प्रत्येक केंद्राला मागणीनुसार लसींचा पुरवठा करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिका त्याप्रमाणे रोजच्यारोज आम्हाला लसीकरण करण्यासाठी साठा पुरवते. उद्या लसींची कमतरता निर्माण झाली तर महानगरपालिका नागरिकांना माहिती उपलब्ध करून देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.






