मुंबई – राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निषेधार्थ मुंबईतील झवेरी बाजारातील व्यापारी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यात ‘अबकी बार सिर्फ हम क्यो बेरोजगार’ अशी घोषणा देऊन लॉकडाऊनचा विरोध करण्यात आला. या आंदोलनादरम्यान मानवी साखळी तयार करून राज्य सरकारच्या आदेशाचा व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध केला.
‘अबकी बार सिर्फ हम क्यो बेरोजगार’ आणि ‘महाराष्ट्र मे कोरोना पहले खत्म होगा या व्यापारी’ अशा घोषणा देत झवेरी बाजारातील व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. अनेक ठिकाणी मानवी साखळी तयार करून आणि हाताला काळी फिती बांधून व्यापारी संघटनांनी आज आंदोलन केले. दुकान उघडायला राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे झवेरी बाजारातील सुमारे 3 लाख कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच, 4 लाख ग्रामीण महिलांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे, शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी फॅशन इंडस्ट्री झवेरी असोसिएशनचे पदाधिकारी अनिश जैन यांनी केली.
अनिश जैन यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, गेल्यावर्षी लॉकडाऊन जाहीर केला होता. तेव्हा आम्ही सर्वांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सहकार्य केले होते. मात्र, त्या काळात आमचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. अनलॉकमध्ये आमचा व्यवसाय पूर्व गतीवर येत असताना पुन्हा एकदा राज्य सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आता सणाच्या दिवसांत व्यापार कोसळला तर पुन्हा उभारी घेण्यास दीर्घ कालावधी लागणार आहे. त्यातून अतोनात नुकसान होऊन ग्राहकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे.






