केवळ प्रतिष्ठेसाठी बापलेकासह जावयाने केली ‘त्या’ महिलेची हत्या

यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी शेतशिवारातील एका विहिरीत महीलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. ही आत्महत्या नसून ऑनर किलींग असल्याचे समोर आले आहे. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी २८ वर्षीय मुलीची बाप-लेकासह जावयाने हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आहे. रेखा राम शेडमाके (वय २८ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे.

पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी येथील रेखा हिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील राम शेडमाके यांच्या सोबत झाला होता. काही दिवसापूर्वी रेखा शेडमाके आपल्या माहेरी पेंढरी येथे आली होती. रविवारी, ११ एप्रिलला पेंढरी येथील कवडू करपते यांच्या शेतातील विहिरीत रेखा शेडमाके हिचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदह नागरिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढला. यावेळी महिलेच्या डाव्या हाताला एक कापडी पन्नीत बांधलेली होती. तसेच त्यात एक चिठ्ठी आणि सिमकार्ड आढळले होते. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रूग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांकडून आलेल्या शवविच्छेदन अहवालात त्या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला विहिरीत ढकलण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूध्द खून, आणि खूनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

महिलेजवळ मिळालेल्या चिठ्ठीतील संशयीत मुकेश ऊर्फ देवेंद्र कनाके यांच्या देखील चौकशी करण्यात आली. मात्र तपासात कुठलेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत बहुतेक पुरावे तांत्रिक विश्लेषण तसेच गावात घटनेसंदर्भाने होत असलेल्या वेगवेगळ्या चर्चा यांचा आधार घेतला. त्यावेळी महिलेचा खून हा सामाजिक प्रतिष्ठा राखण्याकरिता झाला असावा, असा संशय पांढरकवडा पोलिसांना आला.

पांढरकवडा पोलिसांनी मृतक महिलेचे वडील विलास मरापे, भाऊ हिरामण मरापे आणि जावई सुभाष मडावी या तिघांना संशयीत म्हणून ताब्यात घेत दि. १६ एप्रिलला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्या तिघांना पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना वेगवेगळ्या पध्दतीने विचारपूस करायला सुरूवात केले. अखेर त्या सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठीच मुलीची हत्या केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.

सामाजीक प्रतिष्ठा राखण्यासाठी २८ वर्षीय विवाहीत मुलीला दि. ९ एप्रिलला रात्री १० वाजताच्या सुमारास पेंढरी शेत शिवारातील मक्याने केलेल्या शेतात वडील विलास मरापे, भाऊ हिरामण आणि जावई सुभाष या तिघांनी पकडून आणले. त्यानंतर सोबत असलेल्या दोरीने मुलीचा गळा आवळून हत्या केली. तसेच तिच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी लिहून तिच्या हाताला बांधून तिला विहिरीत ढकलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खुनाची घटना घडलीच नाही अशी नाट्यमय परिस्थिती निर्माण करुन दोन दिवस आपले नियमित काम करीत राहीले. परंतु, पोलिसांनी कौशल्यापूर्ण तपास करीत ७२ तासातच संपूर्ण घटनेचा उलगडा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here