देशातील कोरोना परिस्थिती अतिशय गंभीर; पंतप्रधान मोदींनी बोलावली केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

नवी दिल्ली – देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्यामुळे आता केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी देशातील लस उत्पादकांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचीही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी एखादा महत्त्वाचा निर्णय घेतात का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता नाकारली असली तरी केंद्र सरकार त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करु शकते.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. सोमवारी देशभरात कोरोनाचे 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 1,619 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला होता. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा दीड कोटींच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here